Saturday, January 21, 2023

ओझं..!


रणरणत्या उन्हात ते दोघे सोसायटीच्या गेटबाहेर आले...हा देखील बहुतेक नकारच. संधीवातामुळे आता आईचं येणं शक्य नव्हते म्हणून बापलेक दोघंच जायचे स्थळ बघायला. वडील साठी ओलांडलेले आणि मुलगी तिशीची...उशीरा झालेली..लग्नाचं अजूनही कुठे जमत नाही. आजचं कदाचित सत्तावीसावं किंवा कदाचित तिसावं स्थळ.... मुलाच्या चेहऱ्यावर नकार स्पष्ट दिसत होता. सोफ्यावर बसताक्षणी तिसऱ्या मिनिटात तो मोबाईलमधे डोकं खुपसून बसला. खोपोलीहून इतक्या धावपळीत दोन गाड्या बदलून येणं अगदीच फुकट गेलं.... तिला बाबांची काळजी सतत वाटते. आताशा त्यांना बीपीचा त्रास होतो. आईसारखे अगदीच सांधे कामातून गेले नसले तरी आता गुडघे कुरकुरतात त्यांचे....नंबर वाढलाय तो वेगळाच.

ती देखील अगदी चारचौघींसारखी. साधी सरळ, नाकासमोर चालणारी, खालमानेने वावरणारी, शांत, सोशिक....तिघांचाच संसार आणि इवलंसं विश्व. ती इतकी साधी की नाक्यावरची टवाळ पोरं तिची दखलही घेत नाहीत, कधीतरी आपल्याला बघून एकाने तरी शिटी मारावी अशी सुप्त इच्छा व्हायची तिला, ते कधीच झाले नाही. ती शेजारुन गेली की कडक मास्तरीण वर्गावर आल्यावर कार्टी गप्प बसतात तसा क्षणभर नाका शांत होई...

बाबा रिटायर होऊन तीन वर्षे...आई अंथरुणाला खिळलेली.... तिची टीचभर नोकरी... परिस्थिती ठीकठाक...तिचा छोटासा पगार आणि बाबांचं इवलंसं पेन्शन मिळून रुखुटुखु सुरु होतं. दोनेकशे माणसांचं जमेल इतपत लग्नाचं बजेट होतं बाबांचं. साधंच लावूया लग्न असं ती म्हणे... कधी होणार?

उन मी म्हणत होतं. दोघं निःशब्दपणे पावलं टाकत चालत होते. “सुनिता, रस घेऊया चल” बाबा म्हणाले. दोघं रसवंतीगृहात शिरले. किंचित बरं वाटलं. छन्नक छन्नक करत मशीन सुरु होतं... "अद्रक निंबू डालना हां" ...बाबा उगाच काहीतरी म्हणाले. "काका, मी सातारचा. मराठीतनं बोला की" रसवाला हसला. बाबा किंचित वरमले...
तिच्याकडे वळून म्हणाले, “त्या केळकर गुरुजींनी सांगितलेले अकरा सोमवार झाले का गं सुनिता?” वास्तविक पाहता ते सोमवार होऊन तीन महिने झाले होते आणि बाबांनी हा प्रश्न अनेकदा विचारुनही झाला होता..."हो" ती म्हणाली. केळकर गुरुजींच्या मते खरंतर खडतर योगच होते. तिच्या ऑफिसमधल्या रणदिवेचा चुलतभाऊ पत्रिका बघून म्हणाला होता, हिचं लग्न होणं next to impossible आहे.... अर्थात ते तिनं बाबांना सांगितले नव्हते.

रसाचे ग्लास आले. कोणीतरी अंतरात्म्यावर थंड अभिषेक करावा असं वाटलं. तिच्या घामेजलेल्या म्लान चेहऱ्यावर तरतरी आली. बाबा डोळे बंद करून रस पित होते. आताशा त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आणि सुरकुत्या एकदमच दिसत होत्या. दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या चपलांच्या टाचा झिजल्या नसल्या तरी चपलांच्या कडांवरची धुळीची पुटं आता दिसत होती. साईबाबा बसायचे तसे एकावर एक पाय टाकून बसण्याची बाबांची जुनी पध्दत... आपल्यामुळे किती त्रास होत असेल या थकलेल्या जीवाला? तिच्या मनात आलं. बाबा शांतपणे रस पित होते....

तिचं लक्ष बाहेर गेलं. रसवंतीगृहाबाहेर उन्हाची तलखी कमी व्हायला पाणी शिंपडलं होतं. एक छोटीशी चिमणी तितक्यात आली, शेजारच्या इवल्याशा हौदात चोच बुडवून पाणी प्यायली आणि मग तेच पाणी त्या नखभर चोचीत घेत तिची आंघोळ सुरु झाली. सुनिता रस पिता पिता शांतपणे सगळं न्याहाळत होती. सचैल स्नान झाल्यावर ती एकटी चिमणी अंगणात थुईथुई बागडत कसलेसे दाणे टिपत होती. तिचं एकटेपण उपभोगत होती... तिचं कशातही लक्ष नव्हते. ती आणि तिचं स्वच्छंद एकटेपण...शेजारी अजून दोन चिमणा चिमणीच्या जोड्या आल्या. ते त्यांच्या त्यांच्यातच होते पण हिचं एकटेपण मोहक होतं. त्यात एक दिमाख होता...तिच्या वावरण्यात कुठेही औदासिन्य नव्हतं की एकटेपणाची कुतरओढ नव्हती. ती अतिशय आनंदाने बागडत होती. दाणे टिपून झाल्यावर पुन्हा थोडावेळ हौदात मस्ती केली आणि चिवचिवत उडून गेली....सुनिताचे डोळे एक क्षणभर भरुन आले आणि पुढच्या क्षणी.... 

“बाबा” तिने बाबांचं मनगट धरलं.... “अजून एकेक हाफ ग्लास घेऊया का?” बाबांना तिचं लहानपण आठवलं. फडतरे रसवंतीगृहात गेली की सुनिता अशीच एक फुल ग्लास आधी आणि नंतर एक हाफ ग्लास घ्यायची. पण आज एकदम अचानक? तेही हो म्हणाले...पुन्हा नव्याने ऑर्डर दिली. याक्षणी तिच्या मनावरचं औदासिन्याचं जळमट नावालाही जाणवत नव्हतं....रस पिऊन झाल्यावर दोघे एस्टीस्टँडकडे निघाले... 

“सुनिता....” बाबांची गाडी पुन्हा मूळपदावर आली “गांगल बाई म्हणत होत्या...त्यांच्या चुलत दीराचा मुलगा आहे म्हणे....निर्व्यसनी, पुण्यात स्वतःचं घर” तिने पुन्हा बाबांचा हात धरला...ते गप्प झाले. काय गं?... “बाबा ऐका ना...आपण स्पेशल कार करुन गणपतीपुळ्याला जाऊया? आईला पण खूप दिवसांत बाहेर कुठे नेलं नाहीये. तिलाही कोकण बघायचंय हो... थोडा चेंज...मी साठवलेत पैसे. होईल मॅनेज” तिच्या चेहर्‍यावर एक आगळावेगळा आनंद दिसत होता.... “हरकत नाही... पण ते गांगल बाई...” 

ती क्षणभर थांबली. बाबा पण थांबले.... “बाबा, एक सांगू? आता खरंच पुरे झालं हे सगळं. व्हायचं तेव्हा होईल लग्न किंवा होणारही नाही. आता मला खरंच काही फरक पडत नाही बाबा....आनंद हा सतत द्वैतातच का शोधायचा? कधीतरी कोणीतरी स्वतःतही अद्वैत शोधायला काय हरकत आहे? बाबा, आता यापुढे आपण चपला घासत कुठेही जायचं नाही म्हणजे नाही...आपण सोफ्यावर बसताक्षणी तो मुलगा पाच मिनिटात मोबाईलमधे डोकं खुपसून बसला? असल्या माजोरड्यांसोबत मला आयुष्य काढायचं नाही. तुम्हाला खरंच मनापासून सांगू? माझ्या नशिबात खरंच कोणी असेल तर येईलच की....आणि नसेल तरी ठीक आहे बाबा... एकट्याने आयुष्य आनंदाने जगता येतं हे आज मला कोणीतरी दाखवलंय” बाबांना नीट धड काही समजलं नाही...सुनिता लग्नाला तयार आहे पण यापुढे आपण दारोदार भटकायचं नाही हे नक्की.... त्यांच्यासाठी तेवढं पुरेसं होतं... 

उन्हं उतरली होती. एस्टीचा थांबा हळूहळू माणसांनी गजबजत होता. आज तिच्या डोक्यावरुन मणामणाचे ओझं उतरल्यासारखं झाले होते.... 

 
                                               श्री पाटील..

No comments:

Post a Comment