नुकतेच मनू , माझ्या लहान मुलीचे लग्न होऊन तीन
महिने झाले होते. .
मी व बायको दोघेच घरी. .
दोन हजार बारा सालातला तो मे महीना होता. .
मी या विश्वात याच महिन्यात प्रकटलो होतो
खरा तर हा आमचा उत्साहाचा महिना असतो.
वाढदिवसाचे अवचित साधून आम्ही सी बीचवर जाण्याचे ठरवले.
आणि निघालो !!
जशी जशी आमची कार गगनबावड्याचा करुळ घाट उतरू लागली तसे अधिकच उत्साह जाणवू लागला.
हिरव्यागार निसर्गातुन ड्रायव्हिंग करणे म्हणजे एनर्जीचा डोज घेतल्या सारखे वाटते . करुळ घाट उतरताना दिसणारे ते हिरव्यारंगाचे विविध छटाचे दृश्य, न्याहळताना डोळ्याचे पारणे फिटल्याचे अक्षरशः जाणवते
सगळ्याच घाटातला रस्ता नागमोडी असतो खरा , पण करूळ घाटातले नागमोडी रस्ते वेगळाच भीतीयुक्त आनंद देत असतात, एक थ्रिलिंग असते
एका वळणावर उंच पाहिल्यावर गगनगिरी महाराजांचा मठ दिसतो, तिथे न कळत मनांत हात जोडले जातात.
दोन तीन वळणावर कार थांबण्यासाठी जागा केल्या मूळे
तिथे थांबून करूळ घाटाचा विस्तृत डोंगररांगा पाहता येतात
दहा अकरा वाजता तेथून जाताना धुक्यामधून ऊन पसरलेले दिसते, त्या धुक्यातून दिसणारे अस्पष्ट डोंगर झाडी, खूप दूर वर दिसत असतात.
भोगवेबीच वर आम्ही एक च्या दरम्यान पोहचलो
सामंत काका आमची वाट पहातच होते
त्यांच्या रिसोर्ट कडे जाताना, लांब गाडी पार्क करावी लागते समुद्राच्या बाजूने गरम वाळूतून जाताना थोडी कसरत करावी लागते.
समुद्राकडे तोंड करून असलेल्या रूम मध्ये
आम्ही बॅग ठेवली
आणि पहिल्यांदा कोकणी जेवणाचा आस्वाद घेतला,
संध्याकाळी समुद्र किनारी फेरफटका मारताना खूप आनंद वाटत होता
संध्याकाळच्या कातरवेळी त्या लाटांकडे बघितल्यावर मनातली जळमटं पार विरून गेली.किती सुंदर होत्या त्या लाटा! एकेक लाट स्वच्छंदपणे खेळणारी , उत्साही, वेगळाच आहे हा भोगवे समुद्र किनारा.
त्या लाटांमध्ये तेवढ्याच मनमुरादपणे किनाऱ्यालगत आम्ही दोघे उभे. . .
"वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आनंद"
कुमुदच्या गोड गळ्यातुन व्यक्त झालेली भावना ती हृदयातून आली होती
भावना तीच.....व्यक्त करण्याची अचूक वेळ व ती हटके पद्धत मात्र वेगळी
त्या सहजीवनातल्या व्यतीत झालेल्या जगण्यावर ती प्रेम करणारी भावना माझ्या हृदयात स्थिरावली आणि अश्या या वेळी किनाऱ्यावर येणारी प्रत्येक लाट पाहताना मला अस वाटू लागलं की या लाटेनी जणू पक्क ठरवलंय की किनाऱ्याला भेटुनच यायचंच, कुणाचीही तमा न बाळगता. आपलं प्रेम दर्शविणारी एकेक पांढरी लाट अन् त्यावर मावळत्या सूर्यप्रकाशाची सोनेरी किनार, ते बघताना , जरतारी पांढरे वस्त्र लेऊन ती लाट किनाऱ्याला भेटायला येते आणि
कुमुदच्या व्यक्त केलेल्या भावनेत मिसळून जाते , अश्या अनोख्या भेटी मुळे मला माझा आजचा वाढदिवस खूप आगळा वेगळा वाटला
एकच मिनिट हं ।
कुमुद ने जपून आणलेला शिवाय स्वहस्ते केलेला केक कापून सागर किनारी वाढदिवस साजरा केला.
व्वा! किती सुंदर . . . . !!!
रात्री रिसीर्ट वर एक वीस बावीस वर्षाचा ,हसरा तरुण भेटायला आला
नाव काय तुझे ?
सागर !
उद्या सकाळी डॉल्फिन राईड करायची आहे ना, त्या साठीच भेटायला आलोय
फक्त डॉल्फिन राईड नको, कांही खास दाखवशील का?
म्हणजे ?
अरे सुनामी बेट, शिंपली बेट ,कवडा बेट
व जवळपासचे सगळे पॉईंट बघून झालेत,
थोडं कांही वेगळं दाखवशील का?
साहेब , पहाटे सव्वा पाचला तयार राहव्वा, नक्कीच कांही तरी वेगळं दाखवतो
मी फक्त त्याच्या कडे पाहून हसलो
कुमुद ने त्याला केक दिला, तो खुश झाला
पैसे किती द्यायचे?
समजून कांही पण द्या. . !
तो पैशासाठी काम करत नव्हता,
पहाटे पाच लाच आम्ही तयार झालो
पाच दहा ला सागर ची हाक आली
साहेब sssss !!!
कांही अंतरापर्यंत आम्ही कार नी गेलो
थोडे डाव्याबाजूला चालत गेल्यावर समुद्र किनारा दिसू
लागला, सागर नी आपली बोट तयार ठेवली होती
खरतर ती फिशिंगची बोट होती, प्रवासी नव्हती
सागर, अरे सेफ्टीजॅकेट कुठे आहेत ?
दोन मिनिट थांबा सायबानू लगेच आणतो
साधारण पाच चाळीस ला आम्ही सी राईड ला निघालो
अजून उजाडले नव्हते
समुद्र शांत होता
सायबानो तुमच्या साठी नाश्ता आणलाय बर का!
हे ठेवा।
त्यांनी आमच्या साठी घावन व खोबऱ्याची चटणी आणली होती,
आई नी लवकर उठून बनवलं. .
किती प्रेमानी सांगत होता तो
व्वा ! छान, त्यांना धन्यवाद सांग
अर्ध्या तासात तो एका बेटा जवळ येऊन थांबला
हे बेट तुम्ही नक्कीच पाहिला नसणार,
कारण इथे कोणाला यायला परवानगीच नाही
आमच्या रिसोर्ट पासून आम्ही खूप लांब आलो होतो
आणि खरोखर आम्ही हे बेट पाहिले नव्हते
त्याच्या नांवेला त्यांनी नांगर केलं
व पूर्वे ला आम्ही चालत निघालो
त्या खडकाच्या बाजूने चालताना पाय घसरत होते
अजुनी पूर्ण उजाडले नव्हते
एका खडका जवळ जाऊन तो थांबला
आम्हाला त्या खडकावर त्यांनी बसवले
तो बाजूला थांबला
समोर अथांग सागर, पण शांत...!
हेलकावणार्या लाटा...!!
थंडगार वारा....!!!
जिकडे पाहिलं तिकडे नुसते पाणीच पाणी....!!!!
कांही क्षणात रंगी बेरंगी आकाश दिसू लागले
लाटांचा वेग वाढू लागला. .!
आम्ही बसलेल्या खडकावर त्या धडकू लागल्या
पूर्वेकडील क्षितिज तांबड्या,पिवळ्या,नारंगी रंगानी
सजू लागले
आणि. . . !!!
सुर्यनारायणाच्या आगमनाची चाहूल लागली
बालसुर्यानी आपले अस्तित्व दाखवले
खूप लांबून समुद्राच्या पाण्यातुन तो उगवू लागला
तसे समुद्राच्या लाटांना वेग येऊ लागला व आम्ही
बसलेल्या खडकावर आदळून ते फेसळलेले समुद्राचे पाणी आमच्या वर पडू लागले
जस जसा सूर्य वरती वरती येऊ लगला तसे तसे त्या खडकावर आदळलेल्या लाटानवर सुर्यप्रकाश पडू लागला व ते फेसळलेले
पाणी सप्तरंगी होऊन आमच्यावर बरसू लागले
बराच वेळ आम्ही तो सप्तरंगी फवाऱ्यात मस्त खडकावर बसून
भिजत राहिलो, अवर्णनीय आनंद मिळत राहिला,
इतक्यात सागर ची धडपड चालू झालेली दिसली
मी व कुमुद त्या खडकवरून उठलो
अरे सागर काय झाले?
साहेबानू, समोर पहा!
त्या अथांग समुद्रात बऱ्याच लांब, एक बोट हेलकावताना दिसत होती
सागर ची नाव नांगरातून निसटून समुद्रात निघून गेली होती
साहेब तुमचे जरा ते सेफ्टीजॅकेट द्या
मी त्याला दिल्यावर
साहेब घाबरू नका बर का
मी येतोच आपली बोट घेऊन
असे म्हणून त्यांनी त्या बोटीच्या दिशेने उडी मारली सुद्धा...
आम्ही थक्क होऊन फक्त त्याच्या कडे पहात राहिलो
समुद्राच्या लाटावरून तो लीलया पोहत आपल्या बोटी जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता
आम्ही त्या बोटी कडे व सागर कडे पहात खडकावर उभे होतो
काही वेळात ते दोघेही दिसेनासे झाले
मग मात्र आम्ही कांहीसे घाबरलो
पण उसने धैर्य आणत एकमेकांना समजवत राहिलो
आठ वाजत आले होते , दोन तास आम्ही खडकावर बसून राहिलो होतो. समुद्रात उडी मारण्या अगोदर त्याचा मोबाईल
घड्याळ सगळं टाकून गेला होता तो
आम्ही रिसीर्ट मालकाला फोन करण्याचा वायफळ प्रयत्न करू लागलो , त्या बेटा वर रेंजच नव्हती
कुमुदने आणलेला कालचा केक व त्यांनी दिलेला नाष्टा व आणलेला कांही खाऊ आम्ही तश्या भीतीयुक्त वातावरणात फस्त केला,
आता नऊ वाजत आले होते
आमचा कोणाशीच संपर्क होत नव्हता
चार तास झाले तरी सागरचा कांहीच पत्ता नव्हता
नको नको ते विचार येत होते
पण व्यक्त कसे करायचे असे एकमेकांना वाटू लागले
आताआम्ही ज्या खडकाजवळ थांबलो होतो तिथे समुद्राने आपले अस्तित्व विस्तारले होते
प्रत्येक लाटे बरोबर खेकडे येऊ लागले होते
कांही मिनिटात खूप खेकडे आजूबाजूला जमा झाले
आम्हाला भीती वाटू लागल्याने
त्या बेटाच्या वरच्या भागात जाण्या साठी रस्ता शोधू लागलो
एका ठिकाणी पाय वाट दिसली, एकएकटे जाऊ शकत होतो.
पायवाटेने जाताना बऱ्याचदा काट्याची झाडे हाताला लागत होती, रस्ता वळणाचा होता त्या मुळे पुढे काय असेल याचा अंदाज येत नव्हता, पुढे कुमुद होती व ती चालत असल्याने मला तिच्या मागे जावेच लागत होते
वाऱ्याने पाने सळसळली तरी एक अनामिक भीतीची लकेर
उठायची
जरी छोटे बेट वाटत असले तरी आता खूप चालतोय असे वाटू लागले होते
चालता चालता कुमुद एकदम थांबली
त्या बेटा वरती छोटेशे पठार होते
एक बऱ्यापैकी उंच झाडा भोवती स्वच्छ केलेली जागा दिसली
ती शेणाने सारवल्या सारखी दिसत होती, व एक कोपऱ्यात
नुकतीच लावलेली उदबत्ती होती,तिचा सुगंधी वास पसरला होता
स्वच्छ जागा व उदबत्ती लावलेली दिसल्या मुळे नक्कीच
कोणीतरी असावे म्हणून हाका मारल्या
पण कोणीच प्रतिसाद दिला नाही
पुन्हा एक अनामिक भीती मनांत उदभवली,
आम्ही दोघे ही तिथे खालती बसलो
थोड्याश्या विश्रांती नंतर आम्ही नकळत तिथे बसून गुरुगीता म्हणू लागलो, गुरुगीता झाली आरती म्हंटली आणि जयजयकार केला, थोडे धैर्य आले
आता अकरा वाजत आले होते
सागर चा तरी पत्ता नव्हताच तो म्हणाला होता या बेटा वर यायला परवानगी नाही म्हणून
म्हणजे आता कोणच इथे आले नाही तर....!!!
पुन्हा गुरुदेवांना नमस्कार केला व विनवणी केली
आम्हाला आमच्या जागेवर सुखरूप पोहचवा
तेव्हड्यात तिथे मोबाईल वाजू लागला
रिसोर्ट मधून फोन होता
आम्ही थोडक्यात सर्व सांगितले
कांही वेळात दुसरी बोट आली आणि आम्ही रिझोर्ट वर सुखरूप पोहचलो
रिसोर्टच्या मालकांनी विचारले
कसे काय गेलात त्या बेटावर? सागर पण वेडा मुलगा आहे
सागर कसा आहे, कुठे आहे तो
अहो तो अजून सापडला नाही त्याच्या शोधत गेलेत आठ दहा बोटी.
काळजात चर्र झाले
तीन वाजता आम्ही त्याच्या घरी गेलो
त्याची आई दारातच बसली होती
आतून सागरचा आवाज आला
साहेबानू आत या की
घाबरला नाही ना?
सागर तू केंव्हा आलास
आत्ताच, अर्धा तास झाला
अहो बोट खुप लांब चालली होती
मध्येच एका डॉल्फिन चुकून बोटीत पडला
ते पाहून तीनचार डॉल्फिन ने बोट अडवली
मी तीन चार तास समुद्रात पोहून दमलो होतो
बोट काय हाताला लागत नव्हती
पण डॉल्फिन ने अडवल्या मुळे मला बोटी जवळ जाता आले
मी बोटीत जाऊन त्या अडकलेल्या डॉल्फिन ला बाहेर काढले
मग कांही केल्या बोट चालू होईना
पोहून दमल्या मुळे वल्हवता पण येईना
लांबून बोट जात होत्या
त्यांना इशारा करत होतो
एकच्या दरम्यान आठ दहा बोटी एकदम आल्या
त्यांच्या मदतीने परत आलो
आता तुमच्या कडेच येणार होतो
कांहीच झाले नसल्या सारखे तो बोलत होता,
आम्ही रिसोर्ट वर आलो
असा आगळा वेगळा वाढदिवस साजरा झाल्याने आम्ही दोघांनी गुलदस्त्यातच ठेवण्याचे ठरवले कारण जावई व मुली न कडून ओरडा खायचा नव्हता, खूप फिरायचे होते
पण अजून पर्यंत त्या बेटावर त्या वेळी कोणी उदबत्ती लावून गेली होती ते मात्र कळत नव्हते..
श्री पाटील..